महापुरुषांच्या कार्याची बेरीज झाल्यास त्यांच्या विचारांचे सामर्थ्य वाढेल वैश्विक एकात्मतेसाठी आणि कल्याणासाठी सर्व धर्मातील चांगल्या गोष्टी एकत्रित येणे गरजेचे. – डॉ श्रीपाल सबनीस

शरीफ आलम
वसमत – “वैश्विक एकात्मतेसाठी आणि कल्याणासाठी कोणताही एक संत, एक महापुरुष, एक संस्कृती किंवा एक धर्म पुरेसा नसून त्यासाठी सर्व धर्मातील चांगल्या गोष्टी एकत्र करून त्याचा उपयोग मानवी कल्याणासाठी करावा लागेल” असे मत सुप्रसिद्ध साहित्यिक आणि समीक्षक श्रीपाल सबनीस यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, पुणे तर्फे वसमत येथील महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयात आयोजित “श्यामची आई कृतज्ञता सोहळा” कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.
पुढे बोलतांना ते म्हणाले, “वंचितांच्या पिढ्या शिकाव्यात म्हणून डोळस असलेल्या वसमत येथील कै. दशरथ (बापू) माचेवार या अंध माणसाने ही शाळा सुरू केली असून राष्ट्र सेवा दल, आंतरभारती व समाजवादी विचारधारेवर चालणाऱ्या या संस्थेत हा कार्यक्रम होतोय हे भाग्य म्हणावे लागेल. आईवर प्रेम करणारा, भारतीय संस्कृतीवर प्रेम करणारा, ब्राम्हण असूनही साने गुरुजी मुस्लिम धर्माची स्थापना करणाऱ्या महंमद पैगंबरावर पुस्तकं लिहितात ही साने गुरुजींची भूमिका मला मानवतावादी वाटते. सानेगुरुजीनी शिक्षक, समाजकारण व राजकारण हे लोकशाही समाजवादाचं केलं. ते आदर्श उदाहरण आहेत. आजचा समाज हा व्यसन, भ्रष्टाचार याने पोखरलेला आहे अशा वेळी सानेगुरुजींच्या आदर्श विचारांची पेरणी करणारी आशी शाळा हवी आहे. राजकारण्यांची गाठोडी उचलण्यासाठी शिक्षकांच्या डोक्याचा वापर होत असेल तर देशाचे भवि्तव्य धोक्यात आहे.”
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री चैतन्य शिक्षण संस्थेचे सचिव अॕड.रामचंद्रराव बागल तर मराठवाड्यातील ज्येष्ठ साहित्यिक डॉ.जगदिश कदम, योगानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नागनाथ पाटील, नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे , डॉ सबनीस, पंतप्रधान श्रमश्री पुरस्कार प्राप्त बाजीराव सातपुते इ. मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी शारदाबाई बेंबडे व विजयकुमार बेंबडे या माता-पुत्रांना “श्यामची आई” पुरस्काराने, श्रीनिवास मस्के यांना “सानेगुरुजी विचारसाधना” पुरस्काराने तर आंतरभारतीच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा संगीता देशमुख, पांडुरंग बोराडे आणि मुंजाजी जोगदंड या शिक्षकांना “सानेगुरुजी शिक्षकप्रतिभा” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
यावेळी मराठवाड्यातील ज्येष्ठ साहित्यिक जगदीश कदम यांनी मनोगत व्यक्त करतांना म्हटले की, “आत्तापर्यंत पुणे आणि मुंबई सारख्या महानगरापर्यंत मर्यादित असणारे मराठी कथा कादंबरी आणि काव्य इंद्रजीत भालेराव यांसारख्या कवींनी मराठवाड्यातील आपली अस्सल प्रतिभा दर्शवून मराठवाड्याकडे खेचून आणली, अनेक नामवंत कवी आणि इतर साहित्यिक मराठवाड्यामध्ये प्रसिद्ध झाले आणि पश्चिम महाराष्ट्रातील साहित्यिकांना मराठवाड्यातील साहित्यिकांची नोंद घेणे भाग पडले.”
या कार्यक्रमासाठी आंतरभारतीचे अध्यक्ष अनंत साधू, कार्यकारणीतील सुभाष लालपोतू, बालासाहेब महागांवकर, श्यामभाऊ डिगूळकर, अपर्णा तनपुरे, शिवाजीराव सूर्यवंशी, विकास मस्के, मधुकर सोकळवार, कमलाकर चव्हाण, मा. मा. जाधव, ज्योती करजगीकर, भास्कर शास्त्री यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित नागरीक, म.गांधी विद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

