वसमत रेल्वे स्थानकावर सर्व एक्सप्रेस व सुपरफास्ट गाड्यांना थांबा द्या
नागरिक व व्यापाऱ्यांचे रेल्वे प्रशासन व लोकप्रतिनिधींना निवेदन..

- शरीफ आलम
मरसुळ-नांदेड बायपास रस्त्याचे काम मंजूर होऊनही अद्याप सुरू झाले नसल्याने ते तात्काळ सुरू करून लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, तसेच वसमत रेल्वे स्थानकावर सर्व एक्सप्रेस व सुपरफास्ट गाड्यांना थांबा देण्यात यावा, अशी मागणी रेल्वे संघर्ष समिती, वसमत येथील व्यापारी व नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनात म्हटले आहे की, वसमत हे मराठवाड्यातील एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र असून दररोज मोठ्या प्रमाणात व्यापारी, विद्यार्थी, शासकीय कर्मचारी व नागरिक रेल्वे प्रवास करतात. मात्र वसमत रेल्वे स्थानकावर अनेक महत्त्वाच्या एक्सप्रेस व सुपरफास्ट गाड्यांचा थांबा नसल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सर्व एक्सप्रेस व सुपरफास्ट गाड्यांना वसमत येथे नियमित थांबा देण्याची मागणी करण्यात आली आहे.तसेच गाडी क्रमांक 17605/17606 काचिगुडा – भगत की कोठी (पूर्णा जंक्शन – अकोला मार्गे) ही दैनिक रेल्वे सेवा असून या गाडीला वसमत येथे थांबा मंजूर करण्यात यावा, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.याशिवाय वसमत रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक २ चे रखडलेले काम तातडीने सुरू करावे, तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी कोच इंडिकेटर यंत्रणा बसविण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.मरसुळ-नांदेड बायपासचे काम त्वरित सुरू झाल्यास वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, तर वसमत रेल्वे स्थानकावर अधिक गाड्यांना थांबा मिळाल्यास व्यापारी, विद्यार्थी व सर्वसामान्य प्रवाशांची मोठी गैरसोय दूर होऊन आर्थिक व सामाजिक विकासालाही चालना मिळेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.या मागणीसाठी दीपक जनार्धन कुल्थे, जगदीश मोरे, म. इब्राहिम, साईनाथ पतंगे, सचिन बाबडे, आशिष दलाल, सागर दलाल, गजानन सातपुते, सोपान काळे यांच्यासह अनेक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.खासदार रामराव वडकुते यांना दिले निवेदन-खासदार रामराव वडकुते यांची भेट घेऊन रेल्वे संघर्ष समितीने सदर मागण्या संदर्भात निवेदन सादर केले व रेल्वे संदर्भात वसमत चे प्रश्न रेल्वे बोर्ड व दिल्ली दरबारी मांडण्याची विनंती केली या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष गजानन घुगे, उपाध्यक्ष शिवदास बोड्डेवार आदी उपस्थित होते.

